पाठ ८५ वा - बृहत्कथा
खूप दिवसात संस्कृत साहित्याची ओळख करून द्यायला वेळ मिळाला नव्हता. आज बृहतकथा ह्या संस्कृत साहित्यातील कथावाङ्मयातील एका ग्रंथाची ओळख करून देत आहे.
संस्कृत साहित्यात कथासाहित्याचे दालन फार मोठे आहे. कथासाहित्यातील एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे बृहत्कथा. पंचतंत्र, हितोपदेश, वगैरे ग्रंथ सर्वपरिचित आहेत. ‘वेतापञ्चविंशति:’ या ग्रंथातील विक्रम व वेताळच्या कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. या कथासाहित्यामधे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो गुणाढ्य ह्या कथालेखकाचा.
गुणाढ्य केव्हा होऊन गेला असावा ह्याबद्दल नेहेमीप्रमाणेच विद्वानांच्यामधे मतभेद आहेत. त्याच्या संबंधी ही गोष्ट प्रसिद्ध आहे की त्याने बृहत्कथा नावाचा विशालकाय कथासंग्रह लिहीलेला होता. हा कथासंग्रह मूळ पैशाची भाषेत लिहीलेला होता. रामायण व महाभारताप्रमाणेच या ग्रंथाचा उत्तरवर्ती ग्रंथकारांचा हा ग्रंथ म्हणजे प्रेरणास्रोत होता. पंचतंत्रामधे पशुपक्षांच्या गोष्टीतून राजनीती शिकवलेली आहे. तर बृहत्कथेमधे सामाजिक जीवनातील नित्य घडणार्या चित्रविचित्र गोष्टी रंगवलेल्या आहेत. त्यामुळे हाही ग्रंथ लोकप्रिय आहे. सुबन्धु, बाण, दण्डी, हर्ष, त्रिविक्रम भट्ट, धनंजय, सोमदेव वगैरे अनेक कवी व कथाकारांनी गुणाढ्याचा आदराने उल्लेख केलेला आहे.
त्याच्या कथासंग्रहात त्याच्याविषयी आलेली माहिती अशी आहे.
गुणाढ्य हा पूर्वजन्मातील माल्यवान नावाचा शिवाचा गण होता. पुष्पदंत व माल्यवान यांना पार्वतीने काही कारणाने रागावून शाप दिला आणि त्यांनी कौशाम्बी नावाच्या नगरीमधे वररुची व गुणाढ्य या नावांनी जन्म घेतला. नंतर हा राजा सातवाहनाच्या दरबारात होता. एक दिवस गुणाढ्य विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी जंगलामधे गेला होता. तेथे त्याला काणभूती पिशाच भेटले. तेव्हा गुणाढ्याने त्याला पुष्पदंताची कथा पैशाची भाषेत सांगण्याची विनंती केली. तेव्हा काणभूती पिशाच म्हणाले की तू आधी तुझी कथा सांग. तेव्हा गुणाढ्याने त्याला आपली कथा ऐकवली कथा ऐकवली.
गुणाढ्याने सांगितलेल्या वृत्तांतानुसार सुप्रतिष्ठित नावाच्या नगरातील कीर्तिसेन व श्रुतार्था यांच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. वत्सक व गुल्मक असे त्याचे दोन मामा होते. गुणाढ्याचा जन्म झाला व त्याची आई व दोन मामा यांचे निधन झाले. शिक्षण घेऊन मोठा झाल्यावर तो एक दिवस सातवाहनाच्या दरबारात पोचला व त्याला तिथे मंत्रीपद मिळाले. सातवाहनाच्या दरबारात मंत्रीपद निभावत असतांना तो काही विद्यार्थ्यांना शिकवतही असे.
एकदिवस सातवाहन राजा आपल्या राण्यांबरोबर जलक्रीडा करत होता. तेव्हा एका राणीने म्हटले ‘मोदकै: परिताडय’ संस्कृतमधे मोदक म्हणजे लाडू. म्हणून राजाने ताबडतोप लाडू मागवले. तेव्हा राणी हसू लागली. राजाला म्हणाली, ‘पाण्याने मारू नका असे मी म्हटले. मोदकै: हा मा + उदकै: असा संधी आहे. ‘उदकै: मा परिताडय’ अर्थ झाला पाण्याने मारू नका. मा म्हणजे नको या अव्ययाचा उपयोग नेहेमी आज्ञार्थाबरोबर केला जातो.
आपल्या मूर्खपणावर राजा लज्जित झाला. तेव्हा त्याने पण केला की ‘मी एकतर शिकून विद्वान तरी होईन किंवा प्राणत्याग तरी करेन.” राजाने गुणाढ्याला विचारले की एक मनुष्य किती दिवसात विद्वान होऊ शकेल ? गुणाढ्याने सांगितले की व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यास कमीतकमी सहा वर्षे तरी लागतील. सातवाहनाच्या दरबारात आणखी एक शर्ववर्मा नावाचा मंत्री होता. त्याने राजाला सहा महिन्यात व्याकरण शिकवीन म्हणून सांगितले. शर्ववर्माचे बोलणे ऐकून गुणाढ्य म्हणाला की जर त्याने राजाला सहा महिन्यात व्याकरण शिकवले तर आपण संस्कृत, प्राकृत व देशी भाषा बोलणे बंद करू.
शर्ववर्माने कार्तिकस्वामीची तपस्या करून सिद्धी प्राप्त केली व त्याने राजाला सहा महिन्यात संस्कृत व्याकरण शिकवले. तेव्हा गुणाढ्याने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे संस्कृत, प्राकृत व देशी भाषा बोलणे सोडून दिले व पुन्हा विंध्यवासिनीच्या दर्शनार्थ गेला व तेथे त्याने पैशाची भाषेचे अध्ययन केले.
नंतर काणभूती पिशाचाने सुद्धा पुष्पदंतांची कथा गुणाढ्याला सांगितली. काणभूती पिशाचाने सांगितलेली कथा गुणाढ्याने आपल्या रक्ताने सात वर्षपर्यंत सात लाख श्लोकात लिहीली. नंतर गुणाढ्याने आपल्या शिष्यांच्या द्वारा ती कथा सातवाहनाकडे पाठवली व ती कथा प्रकाशित करण्याविषयी आपला संदेश सुद्धा दिला. परंतु सातवाहनाने त्या कथेबद्दल आपुलकी दाखवली नाही. आपल्या कथेचा सातवाहनाने तिरस्कार केल्याचे कळताच गुणाढ्याला फार वाईट वाटले. त्याने आपल्या कथेचा जंगलामधे यज्ञ आरंभला. तो आपल्या ग्रंथातील पाने पशु-पक्ष्यांना वाचून दाखवत असे व ती पाने अग्नीला समर्पित करत असे.
इकडे सातवाहन राजा आजारी पडला. वैद्यांनी निदान केले की शुष्क मांस खाल्यामुळे राजा आजारी पडला आहे. तेव्हा राजाने शिकारी लोकांना पक्षांचे मांस शुष्क का आहे त्याचे कारण विचारले. तेव्हा शिकार्यांनी सांगितले की जंगलात एक ब्राह्मण पशु-पक्ष्यांना कथा सांगत असतो. त्या कथा इतक्या रोचक आहेत की सर्व पशु-पक्षी भूक तहान विसरून त्या कथा ऐकत असतात. त्यामुळे दररोज पक्षी वाळून जात आहेत. चांगले मांस मिळेनासे झाले आहे.’
हे ऐकून राजा जंगलात गेला. ज्या कथा पशु-पक्ष्यांना सुद्धा आवडतात त्या नक्कीच चांगल्या असल्या पाहिजेत, हे लक्षात येऊन त्याने गुणाढ्याकडे आपल्या कृत्याची माफी मागितली. तोपर्यंत सहा लाख श्लोक अग्नीला समर्पित झाले होते. उरलेले एक लाख श्लोक गुणाढ्याने सातवाहनाला दिले.
ऐतिहासिक उल्लेखांवरून असे दिसून येते की इ. स. ६०० पर्यंत बृहत्कथा ग्रंथ मूळ रूपात उपलब्ध होता. आता हा ग्रंथ मूळ रूपात उपलब्ध नाही. पण सध्या बृहत्कथा ग्रंथ अनुवादित स्वरूपात उपलब्ध आहे. १) बृहत्कथाश्लोकसंग्रह या नावाने नेपाळ मधील बुद्धस्वामींनी या ग्रंथाचे संस्कृत रूपांतर केले आहे. पण हा अनुवाद अपूर्णच आहे. यात २८ सर्ग व ४५३९ पद्य आहेत. विद्वानांच्या मतानुसार यामधे १०० सर्ग व २५००० पद्ये असावीत. यामधे संस्कृत रूपांतरात कोठे कोठे प्राकृत भाषेचा प्रयोग झाला आहे. संभवत: तो भाग मूळ बृहत्कथेचा असावा.
२) ११ व्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या क्षेमेंद्र नावाच्या लेखकाने बृहत्कथामञ्जरी नावाने बृहत्कथाग्रंथाचे सार लिहिले आहे. त्यात ११ लंबक व ७५०० पद्य आहेत. ह्यानेच रामायण व महाभारत ग्रंथांचे सुद्धा सार लिहिले होते. रामायणमंजरी हा सारग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर त्याने बृहत्कथामंजरी हा सारग्रंथ लिहीला आहे.
३) सोमदेव भट्ट याने ‘कथासरित्सागर’ नावाने या ग्रंथाचे संस्कृत रूपांतर केले. यात १८ लंबक, १२४ तरंग व २२००० पद्य आहेत. बृहत्कथामंजरीपेक्षा याची शैली आकर्षक व भाषा प्रभावी आहे.
या तीनही भाषांतरित ग्रंथात भिन्नता सुद्धा दिसून येते.
या बृहत्कथेची २ तमिळ संस्करणेही उपलब्ध आहेत.
No comments:
Post a Comment