Saturday, June 27, 2020

संस्कृतसाहित्याची ओळख - १) वेदवाङ्‌मय

नमस्कार.

आपण संस्कृत भाषा शिकत आहोत त्याच बरोबर आता आपण आठवड्यातून एकदा दर शनिवारी संस्कृतमधील साहित्याविषयी थोडेफार जाणून घेणार आहोत. संस्कृत साहित्य हे विशाल समुद्रासारखे आहे. कारण हजारो वर्षे या भाषेमधे ग्रंथरचना होत गेली आहे. आयुर्वेदादी विषयांवरील हजारो हस्तलिखिते अजूनही पडून आहेत. त्यांना अजूनही पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्याचा योग आलेला नाही.

काळ -
संस्कृतभाषा ही सर्व जगातील प्राचीन भाषा हे आपण पाहिले. ह्या भाषेला प्राचीन भाषा म्हणण्याचे कारण काय ? तर या भाषेत उपलब्ध असलेले साहित्य सर्वात प्राचीन आहे. इतर कोणत्याही भाषेत इतके प्राचीन साहित्य उपलब्ध होत नाही.

संस्कृत साहित्यातील सगळ्यात प्राचीन साहित्य कोणते ? तर वेदवाङ्मय. हे वाङ्मय केव्हा रचले गेले ? विद्वानांमधे त्याविषयी मतभेद आहेत. मुळात आपल्याकडे इतिहासलेखनाची पद्धत नाही. म्हणजे काटेकोर इतिहास लिहिला गेलेला नाही. वास्तविक महाभारत हा इतिहासग्रंथच आहे. पण तो स्वत:ला पुराण म्हणवतो. एकूणच संस्कृत साहित्यात इतिहास ग्रंथ नगण्य आहेत. राजतरंगिणी या ग्रंथात थोडा काश्मिरचा इतिहास आहे. पण आपण खरेतर इतिहासलेखन शिकलो ते इंग्रजांकडून. इंग्रजांनी वेदवाङ्मयावर खूप संशोधन केलेले आहे. हे साहित्य फार जुने नाही हे ठरवण्याकडे इंग्रजांचा कल होता. त्यामुळे ते वेदांचा काळ इ.स. च्या जवळ आणतात. कीथ, मॅक्डोनल, विंटरनिट्झ वगैरे इंग्लिश लेखकांचे संस्कृत साहित्याचा इतिहास लिहिलेले ग्रंथ प्रसिद्ध आहेत. (आपल्याला सध्या मॅक्डोनल हे नाव फक्त बर्गरच्या संदर्भात माहीत आहे. पण मॅक्डोनल नावाचा एक इतिहाससंशोधक होऊन गेला आहे.) मॅक्समूलर हे तर कधीही भारतात आले नाहीत. पण त्यांनी ४० वर्षे वेदांचा अभ्यास केला व त्यांनी वेदांची छापिल प्रत उपलब्ध करून दिली. आपण लोकांनी तर ह्याबाबतीत खूपच अनास्था दाखवली आहे. नंतर इंग्रजांचे पाहून भारतीय पंडित सरसावले व त्यांनीही वेदांचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला. वेदांचा हा काळ इ.स.च्या मागे जितका नेता येईल तितका न्यायचा असा भारतीय पंडितांचा कल होता. वेद वाङ्मय इ.स. पूर्वी लाखोवर्षे ते २५००० वर्षांपर्यंत झाले आहे अशी मतांमधे विविधता आहे. पण लो. टिळकांनी त्यात आलेल्या ग्रहतार्‍यांच्या उल्लेखावरून वेदांचा काळ इ. स. पूर्व ६ ते ८ हजार वर्षे असावा असे मानले आहे. खगोलशास्त्राच्या आधारे हा काळ ठरवला असल्यामुळे तो प्रमाण मानण्यास हरकत नाही. एकूण हे वाङ्मय आठ ते दहा हजार वर्षांपूर्वीचे आहे असे मानण्यास प्रत्यवाय नाही.

संहिता -

आपण वेदवाङ्मयाला संहिता असे म्हणतो. संहिता हा शब्द सम् + धा = गोळा करणे ह्या धातूपासून बनलेला आहे. संहित म्हणजे गोळा केलेले. प्राचीनकाळी निरनिराळ्या देवतांना उद्देशून ऋषींनी सूक्ते रचली. हा कालावधी सुद्धा खूप मोठा आहे. वेदातील काही सूक्ते ही खूप प्राचीन आहेत तर काही सूक्ते त्यातल्या त्यात अर्वाचीन आहेत. असा खूप काळ लोटल्यावर ऋषींना हे सर्व वाङ्मय जतन करून ठेवावे असे वाटू लागले. जागतिक प्रलय, किंवा आतासारखी महामारी असे काहीतरी कारणही घडले असेल की त्यामुळे ही सूक्ते संगृहीत करण्याची गरज भासू लागली. त्यातूनच उपलब्ध होतील त्या सर्व सूक्तांचे संकलन केले गेले व त्याला संहिता असे नाव देण्यात आले.


ईश्वराचे नि:श्वसित -

आपण भारतीय लोक वेदाला ईश्वराचे नि:श्वसित असे म्हणतो. ईश्वराच्या श्वासोच्छ्वासातून आपल्याला हे वेद मिळालेले आहेत अशी आपली धारणा आहे. वास्तविक यातील सूक्ते ऋषींनी रचली आहेत. त्या त्या सूक्ताखाली त्याचा रचयिता कोण ते लिहिलेले आहे.  अर्थातच हे संगृहीत केलेले वाङ्मय असल्यामुळे याचा कोणी एक कर्ता नाही. त्या त्या ऋषींना योगबलाने वेदाचे दर्शन झाले आहे. ऋषी कोणाला म्हणावयाचे ? ‘अतीन्द्रियस्य वेदस्य परमेश्वरानुग्रहेण प्रथमत: दर्शनात् ऋषित्वम्’ परमेश्वराच्या अनुग्रहामुळे अतींद्रिय असलेल्या वेदाचे ज्यांना दर्शन होते ते ऋषी. ‘ऋषि: दर्शनात्’ अशी ऋषी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. थोडक्यात वेदातील मंत्रांचे ऋषींना ध्यानावस्थेत झालेले दर्शन आहे. म्हणून आपण त्याला ईश्वराचे नि:श्वसित असे म्हणतो.

स्थळ -

वेदांच्या निर्मितीचा काळ आपण पाहिला. आता हे वाङ्मय कोणत्या प्रदेशात रचले गेले ? ज्या काळात भारतीय आर्यांची सिंधू नदीच्या दोन्ही तीरांवर वस्ती वस्ती होती त्या प्रदेशात ही सूक्ते रचली गेली आहेत. ही वस्ती पूर्व काबुलिस्तान पासून पंजाबपर्यंत पसरलेली होती.

वेद शब्दाची व्युत्पत्ती -

वेद शब्द विद् = जाणणे या धातूपासून झालेला आहे. म्हणून वेद म्हणजे ज्ञान. ऋक् म्हणजे स्तुतीपर काव्य किंवा श्लोक. म्हणून ऋग्वेद म्हणजे ऋचांमधून व्यक्त झालेले प्राचीनतम व सर्वपवित्र असे ज्ञान. प्राचीनकाळी ऋग्वेदाच्या अनेक शाखा होत्या असे उल्लेख आढळतात. महाभारताच्या शांतिपर्वात २१ हजार शाखांचा उल्लेख येतो. पूर्वी शाकल, बाष्कल, अश्वलायन, शांखायन व मांडूकेय अशा पाच शाखा प्रचलित होत्या. सध्या ऋग्वेदाची शाखल शाखेची प्रतच प्रचलित आहे, त्यात एकूण १०२८ सूक्ते आहेत.

त्रयी -

हजारो वेदमंत्र आहेत व त्यांचे विषयही वेगवेगळे आहेत. म्हणून त्यांचे तीन गटात विभाजन करण्यात आले. १) ऋक् २) यजुष् ३) साम. या तिघांचे सामूहिक नाव आहे त्रयी विद्या.

ऋक् म्हणजे प्रार्थना किंवा स्तुती. जे मंत्र देवतांच्या स्तुतीशी निगडित आहेत त्यांचा एक संग्रह करण्यात आला, तोच ऋग्वेद.

ज्या मंत्रांचा विषय पूजा असा आहे त्यांना ‘यजुष्’ असे म्हणतात. ‘यजते वा अनेन इति; ज्या मंत्रांच्या सहाय्याने पूजा केली जाते त्यांचा संग्रह यजुर्वेदात करण्यात आला. यात यज्ञीय मंत्र म्हणजे यज्ञात उपयोगी पडणारे मंत्र आहेत. ऋग्वेदात केवळ पद्यमय मंत्र आहेत तर यजुर्वेदात गद्य व पद्य मंत्र आहेत.

वरील दोन गटात ज्यांचा अंतर्भाव होत नव्हता अशा मंत्रांचा सामन् या तिसर्‍या गटात समावेश करण्यात आला. सामन् कोणाला म्हणावयाचे ? ‘स्यति नाशयति विघ्नम् इति सामन्’ विघ्नांचा नाश करते ते सामन्. म्हणून सामन् म्हणजे विघ्नशांती. ‘समयति सन्तोषयति देवान् इति सामन्’ म्हणून सामन् म्हणजे देवतुष्टी. त्या मंत्रांची संहिता म्हणजे सामवेद. यातील मंत्र ऋषीजन यज्ञाच्यावेळी
देवांना प्रसन्न करण्य़ासाठी गात असत.

या त्रयीतही मावू शकणार नाहीत असेही काही मंत्र होते. जारण, मारण, मोहन, उच्चाटन हा त्यांचा विषय होता. यांचा चौथा संग्रह करण्यात आला. त्याला अथर्ववेद म्हणतात. जारणा-मारण मंत्रांमुळे त्याला सुरवातीला वेद म्हणून मान्यता नव्हती. कारण आसुरी जगतातील जीवांना संतुष्ट करणार्‍या मंत्रतंत्रांनी हा वेद भरलेला आहे. तसेच भूत-प्रेतादि निम्नस्तरीय शक्तीला जादूटोण्याने वश करण्याचे मंत्रही यात आहेत. पण त्याच बरोबर काही चांगली सूक्तेही यात आलेली आहेत.

आता एक शंका येईल की इतके प्राचीन वाङ्मय छपाईची कला अस्तित्वात नसतांना जतन करून कसे ठेवण्यात आले ? तर पाठांतर पद्धतीने. साडेसातशे वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीतही पाठभेद आढळतात. मग इतके हजारो वर्षापूर्वीचे वाङ्मय जसेच्या तसे असेल का ? त्यात पाठभेद नसतील का ? तर त्याचे उत्तर आहे नाही, यात पाठभेद नाहीत. ही संहिता ज्या काळात केली गेली असेल तशीच ती आतापर्यंत चालत आलेली आहे. आश्चर्यकरण्य़ासारखी गोष्ट आहे ना ? ८ / १० हजार वर्षापूर्वीच्या या वाङ्गमयात पाठभेद नाहीत ? त्याचे कारण त्याच्या पाठांतरपद्धतीत आहे. ऋग्वेद जसाच्या तसा टिकून रहावा म्हणून त्याच्या पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ, अशा अनेक पाठांतर पद्धती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोठे चूक आहे अशी शंका आली तर दुसर्‍या पाठाप्रमाणे ती दुरुस्त करता येते. त्यामुळे ऋग्वेदात पाठभेद नाहीत.

वेदातील देव कोणते आहेत ?

ऋग्वेदसंहितेत देवताशास्त्र तयार होत आहे. निसर्गातील सूर्य, अग्नि, उषा, पर्जन्य, यासारख्या घटनांना हळूहळू देवतांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. इंद्र, अग्नी, सूर्य, उषा, वरुण यांना यात देवत्व दिले गेले आहे. इंद्र व अग्नीला उद्देशून खूप सूक्ते यात आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश ह्या पौराणिक काळातील देवांचे स्थान वेदात नगण्य आहे. देवतांची स्तुती करून त्यांच्याकडे संतती, संपत्ती यांची मागणी करणारी सूक्ते, तत्वज्ञान सांगणारी नासदीय सूक्त, पुरुषसूक्त वगैरे सूक्ते, विवाह व और्ध्वदेहिक विधी सांगणारी सूक्ते, एखाद्या राजवंशातील राजाच्या विजयाचे वर्णन करणारी सूक्ते, राजांच्या दानशूरतेची स्तुती करणारी सूक्ते, नीतिशास्त्रीय सूक्ते, स्त्री-पुरुषविषयक दृष्टिकोन सांगणारी सूते, पुरुरवा-ऊर्वशी, यम-यमी, विश्वामित्र-नदी अशांचे काही संवाद असणारी सूक्ते असे या सूक्तांचे वेगवेगळे विषय आहेत.


या वेद वाङ्मयावरून प्राचीन भारतीय लोकांचे समाजजीवन कसे होते, संस्कृती काय होती, धर्म, स्त्री-पुरुषसंबंध कसे होते, देवताविषयक कल्पना काय होत्या, देवताशास्त्र कसे प्रगत होत गेले, या सर्वांची आपल्याला माहिती मिळते. त्यासाठी त्यांचा अभ्यस करायला हवा व त्यासाठी संस्कृत येणे आवश्यक आहे. कारण हे ग्रंथ संस्कृतमधे रचलेले आहेत. ‘संस्कृति: संस्कृताश्रिता खलु’ भारतीय संस्कृती ही संस्कृतभाषेचा आश्रय करून राहिलेली आहे. म्हणजे त्या साहित्यात ह्या संस्कृतीची बीजे दडलेली आहेत. आणि हे सर्व जाणून घेण्यास संस्कृत भाषा अवगत होणे आवश्यक आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर 

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...