Saturday, June 20, 2020

संस्कृतसाहित्याची ओळख - कालिदास

दर शनिवारी मी आपल्याला संस्कृत साहित्याची, एखाद्या कवीची ओळख करून द्याय़चे ठरवले आहे. आता संस्कृतचे प्राचीन साहित्य म्हणजे वेद वाङ्मय. त्यापासून खरतर सुरवात करायला हवी. पण आज मी हा क्रम थोडा बदलणार आहे. त्याचे कारण असे आहे की उद्या अमावास्या झाल्यानंतर सोमवारी आषाढ प्रतिपदा येते व तो दिवस आपण कालिदासदिन म्हणून साजरा करतो.

उपमा कालिदासस्य भारवेर्थगौरवम् ।
दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: ॥

आता आषाढ प्रतिपदा हा दिन कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून आज मी तुम्हाला संस्कृत कवी कालिदास याच्याविषयी सांगणार आहे.

आषाढ प्रतिपदेला कालिदास दिन साजरा केला जातो. मग आषाढ प्रतिपदा हा कालिदासाचा जन्मदिवस आहे का ? नाही, हा दिवस कालिदासाचा जन्मदिवस नाही. त्याचा जन्म केव्हा झाला, कोठे झाला याची काहीही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना तशी कोणत्याच संस्कृत कवीची माहिती उपलब्ध नाही. संस्कृतकवींनी कधीही स्वत:विषयी फारसे काही लिहून ठेवलेले नाही. सर्व गोष्टींबद्दल आपल्याला अनुमानच करावे लागते. या कवीचा उल्लेख कोणी केला आहे ? त्यावरून हा कवीचा काळ त्या कवींच्या आधी मानायचा व ज्यांनी ह्याविषयी काहीही उल्लेख केलेला नाही त्या कवींच्या नंतर मानायचा अशी ही सर्वसाधारण पद्धती आहे. त्यामुळे इतर अनेक कवींप्रमाणेच कालिदासाच्या प्रामाणिक चरित्राविषयी सुद्धा मतमतांतरे आहेत. काहीजण त्याला बंगाली मानतात, काहीजण त्याला काश्मिरी मानतात तर काही त्याला उज्जैनीबद्दल त्याचा दिसून येणारा ओढा पाहून तो रहिवासी असावा असे मानतात.

कालिदास हा शैव असावा व तो उज्जैनीचा असावा असे काहीजणांनी त्याच्या साहित्यात येणार्‍या उज्जैनीप्रेमावरून ठरवले आहे. कालिदास हा भोजराजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता अशी प्रसिद्धी आहे. तेव्हा भोज राजाच्या समकालीन असावा. पण भोज राजे सुद्धा २/३ होऊन गेले. मग हा नेमका कोणत्या भोजाच्या दरबारात असावा ? कालिदासाने भास या नाटकाकाराच उल्लेख आपल्या काव्यात केलेला आहे. याचा अर्थ तो भासानंतर होऊन गेला. भास इ.स. पूर्व १ शतक ते इ.स. पहिले शतक अशा २०० वर्षात कधीतरी होऊन गेला. याचा अर्थ कालिदास इ.स. पहिल्या शतकानंतर कधीतरी होऊन गेला असावा, भाडांरकर, कीथ वगैरे इतिहासकारांनी त्याचा काळ इ.स. चौथे शतक ठरवला आहे. हा द्वितीय चंद्रगुप्ताचा काळ. त्याने त्याला राजाश्रय दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण कालिदास हा दीड हजार वर्षांपूर्वी कधीतरी होऊन गेला.

त्याच्याविषयी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. कालिदास हा अत्यंत मूर्खशिरोमणी होता. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला घराबाहेर हाकलून दिले व पंडित झाल्याशिवाय घरी यायचे नाही अशी तंबी दिली. मग कालिदासाने कालिमातेची उपासना केली. कालिमाता त्याच्यावर प्रसन्न झाली व तिने त्याच्या जिभेवर हाताने काही लिहीले. आता आपण पंडित झालो असे मानून कालिदास घरी आला. दार ठोठावले. पत्नीने कोण आहे म्हणून विचारले तर त्याने आपली आपण तिचा पती असल्याची ओळख सांगितली. तेव्हा पत्नीने त्याला दाराआडूनच विचारले की ‘अस्ति कश्चिद्वाग्विशेष: ?’ तुला वाणीचा विलास काही प्राप्त झाला आहे का ? त्यावेळी कालिदासाने अस्ति, कश्चित्, वाग्विशेष: हे तीन शब्द सुरवातीला योजून तीन काव्ये लिहिली. त्यातील कश्चित् या शब्दाने मेघदूत काव्याची रचना झालेली आहे.

त्याचे आज तीन नाटके, दोन महाकाव्ये व दोन खंडकाव्ये असे सात ग्रंथ उपलब्ध आहेत. जणु हे सांस्कृतसाहित्यातील सात रंगांनी युक्त असे इंद्रधनुष्यच. विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम्, मालविकाग्निमित्रम् अशी त्याची तीन नाटके आहेत. रघुवंश व कुमारसंभव अशी त्याची दोन महाकाव्ये आहेत तर मेघदूत व ऋतुसंहार ही दोन खंडकाव्ये आहेत. महाकाव्य म्हणजे मोठे काव्य हे त्याच्या नावावरूनच कळते, तर खंडकाव्य म्हणजे शे-शंभर श्लोकांनी युक्त असे लहानसे काव्य. पुरुरवा-उर्वशी यांचे कथानक त्याने विक्रमोर्वशीयम् मधे गुंफले आहे तर दुष्यंत-शकुंतला यांचे कथानक शाकुंतल नाटकात आहे. मालविका व अग्निमित्र राजाचे कथानक मालविकाग्निमित्रम् या नाटकामधे आहे. रघुवंशम् या काव्यात त्याने रामाच्या पूर्वी व रामानंतर होऊन गेलेल्या राजांचे वर्णन केले आहे तर कुमारसम्भवम् काव्यात शंकर-पार्वतीचा प्रथम पुत्र षडानन म्हणजेच कार्तिकेय याने देवांचा सेनापती बनून देवांना विजय मिळवून दिल्याची कथा वर्णिली आहे. खंडकाव्यातील ऋतुसंहार काव्यात वसंतादी सहा ऋतूंचे वर्णन आहे तर मेघदूत हे संस्कृतसाहित्यातील प्रसिद्ध दूतकाव्य. हनुमान लंकेला दूत बनून गेला या कथानकावरून त्याला कदाचित हे सुचले असावे. या काव्यात असे वर्णन केले आहे की यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता. त्याच्या कामात काही चूक झाली, त्यामुळे कुबेराने त्याला एक वर्षाची हद्दपारीची शिक्षा दिली. तेव्हा तो हिमालयातील अलका नगरीतून निघून रामगिरी पर्वतावर आला. तोपर्यंत शिक्षेचे आठ महिने संपले होते. नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे त्याला आपल्या पत्नीचीही आठवण येत होती. अशा मानसिक स्थितीत असतांना त्याला त्या पर्वतावर एक काळा मेघ दिसला. त्याने जाणले की हा मेघ आता हिमालयापर्यंत प्रवास करणार. तेव्हा त्याने त्यालाच दूत बनवून त्याच्या करवी आपल्या पत्नीला निरोप पाठवला की शिक्षेचे आठ महिने संपले आहेत, चारच महिने उरले आःएत. तेव्हा मी लवकरच येत आहे.

१०० श्लोकांच्या आसपास मंदाक्रांता वृत्तात लिहिलेले हे नितांतसुंदर काव्य आहे. या काव्यावरून दिसून येते की कालिदासाचा भूगोल पक्का आहे. सुरवातीला मेघाचा अनुनय, त्याला निरोप सांगण्याविषयी विनंती, मग मार्गाचे वर्णन, नंतर हिमालयात पोचल्यावर अलका नगरीचे वर्णन, आपल्या घराचे वर्णन करून शेवटी मी लवकरच येत आहे हा निरोप.

या काव्यात त्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघ दिसतो असे वर्णन असल्यामुळे आषाढ प्रतिपदेला कालिदासदिन आपण साजरा करतो.

सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...