Monday, August 31, 2020

पाठ ५१ वा काळ-विचार

पाठ ५१ वा काळ-विचार

वाक्यातील क्रियापदावरून काळ व क्रिया कोणी केली म्हणजे कर्त्याचे पुरुष व वचन कळते. संस्कृतमधे क्रियापदे काळसूचक व आज्ञादीसूचक अशी दोन्ही प्रकारची असतात. अशी एकूण १० प्रकारची क्रियापदे तयार होतात. त्यांना संस्कृतमधे १० लकार असे म्हणतात. कारण त्यांची नावे ‘ल्’ या अक्षराने सुरू होतात. 


१) वर्तमानकाळ = लट्
२) अनद्यतन भूतकाळ = लङ्
३) सामान्य भूतकाळ = लुङ्
४) परोक्षभूतकाळ = लिट्
५) सामान्य भविष्यकाळ = लृट्
६) अनद्यतन भविष्यकाळ (प्रथम भविष्यकाळ) = लुट्
७) आज्ञार्थ = लोट्
८) विधि = विधिलिङ्
९) आशीर्वाद = आशीर्लिङ्
१०) क्रियातिपत्ति (हेतुहेतुमद्भाव) = लृङ्

१) वर्तमानकाळ -
संस्कृतमधे वर्तमानकाळ एकच आहे. इंग्लिशमधे I do,  I am doing,  I have done असे जे साधा वर्तमानकाळ, अपूर्ण वर्तमानकाळ व पूर्ण वर्तमानकाळ असे जे काळाचे प्रकार असतात, तसे संस्कृतमधे नाहीत. त्याचे संस्कृतमधे मी करतो, मी करत आहे, मी केलेले आहे, वगैरे संदर्भानुसार  अर्थ करावे लागतात. अहं खादामि वाक्याचा अर्थ मी खातो, मी खात आहे किंवा मी खाल्लेले आहे असा संदर्भानुसार करावा लागेल.

भूतकाळ -
भूतकाळाचे तीन प्रकार आहेत. पाणिनीने त्यात अर्थाचा फरक केला आहे. सगळे भूतकाळ ‘भूते’ म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी या अधिकाराखाली येतात.
२)  अनद्यतनभूतकाळ (प्रथम भूतकाळ) - अद्यतन = आजचा. म्हणून अनद्यतन म्हणजे आजचा नव्हे तो अनद्यतन. अशी गोष्ट भूतकाळातही असू शकते वा भविष्यकाळातही असू शकते.   
 ज्या गोष्टी आज घडलेल्या नाहीत, ज्या क्रिया नुकत्याच घडून गेल्या आहेत, ज्या गोष्टींना आपण साक्षी असतो त्यासाठी प्रथम भूतकाळ म्हणजेच अनद्यतन भूतकाळ वापरतात.
३) परोक्षभूतकाळ (द्वितीय भूतकाळ) - परोक्ष = अक्ष्ण: परम् = दृष्टीच्या आड. (मराठीत परोक्ष व अपरोक्ष हे शब्द बरोबर विरुद्ध अर्थाने रूढ झालेले आहेत.) ज्या घटना दृष्टीआड घडलेल्या आहेत. ज्या घटानांचे आपण साक्षीदार नसतो, अशा घटनांचा उल्लेख करण्यासाठी साधारणपणे परोक्ष भूतकाळाचा उपयोग करतात. म्हणून पौराणिक किंवा ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्यासाठी परोक्ष भूतकाळाचा उपयोग केला जातो. त्यामुळे परोक्ष भूतकाळाची प्रथम पुरुषी रूपे अपवादात्मक दिसतात. स्वप्नातील घटना सांगतांना तसेच कर्त्याने जाणीव नसतांना किंवा बेहोष अवस्थेत एखादी गोष्ट केली असेल तरच प्रथमपुरुषी रूपांचा वापर झालेला दिसतो. द्वितीय पुरुषातही परोक्षभूतकाळाची रूपे फारशी वापरात नाहीत. एखादी गोष्ट सर्वस्वी नाकारायची असेल तरच परोक्ष भूतकाळाचा द्वितीय पुरुषी वापर दिसून येतो.

४) सामान्यभूतकाळ - (तृतीय भूतकाळ)
ज्या गोष्टी अनद्यतनही नाहीत वा परोक्षही नाहीत अशा गोष्टींसाठी सामान्य भूतकाळ वापरला जात असे. परंतु पुढे सामान्य भूतकाळाच्या रूपांच्या वापराविषयी काहीही राहिले नाही. तरीही खूप पूर्वीच्या घटना सांगण्यासाठी याचा उपयोग झालेला दिसून येतो. या भूतकाळाची रूपे बरीचशी अनियमित व क्लिष्ट आहेत. याचे प्रत्ययही सात प्रकारचे आहेत. त्यामुळे शालेय व्याकरणात याचा सहसा समावेश केलेला नसतो. फक्त रूपे ओळखता यावीत एवढीच अपेक्षा असते.

संस्कृतमधे भविष्यकाळही दोन आहेत.
५) अनद्यतन भविष्यकाळ - (प्रथम भविष्यकाळ)
‘क्रिया पुढे होणार आहे’ असे समजले म्हणजे त्या विधानातील क्रियापद भविष्यकाळी होते. अद्यतन म्हणजे आज. म्हणून अनद्यतन म्हणजे जे आज नाही ते. जी गोष्ट आज घडलेली नाही, पुढे घडणार आहे त्यासाठी अनद्यतन भविष्यकाळ योजला जातो. यालाच प्रथम भविष्यकाळ असेही म्हणतात.

६) सामान्य भविष्यकाळ (द्वितीय भविष्यकाळ)
ज्या घटना अनद्यतन नाहीत, आजच पण नंतर करावयाच्या आहेत अशा घटना दाखवण्यासाठी द्वितीय भविष्यकाळ वापरावा असा पाणिनीने या दोन भविष्यकाळात फरक केलेला आहे. पण साहित्यात असा फरक दिसून येत नाही. साधारणपणे द्वितीय भविष्यकाळाची रूपे साहित्यात प्रचारात आहेत.
७) आज्ञार्थ - आज्ञा करण्याकरता आज्ञार्थ वापरला जातो हे सुपरिचित आहे. पण त्याव्यतिरिक्त संस्कृतमधे इतर अनेक गोष्टींसाठी आज्ञार्थ वापरला जातो. बोलणारा व ऐकणारा यांच्या परस्परसंबंधांवर द्वितीय पुरुषी आज्ञार्थाच्या रूपातून हुकूम व्यक्त होतो. खा, पी, उठ, बस वगैरे. हुकुम, आज्ञा यांच्या बरोबरच विनंती, विनवणी, इच्छा इत्यादी अनेक छटाही त्यातून दिसून येतात. बोलणारी व्यक्ती राजा वा अधिकारी असेल तर त्याने वापरलेल्या आज्ञार्थातून हुकूम किंवा आज्ञा व्यक्त होते. वडीलधार्‍या मंडळींना जेव्हा लहानांना किंवा समवयस्कांना मार्गदर्शन करायचे असेल तेव्हा आज्ञार्थी क्रियापदे वापरून त्यातून उपदेश किंवा इच्छेची छटा व्यक्त होते. इतरांचे मन वळवण्य़ासाठी आज्ञार्थाचा उपयोग केल्यास त्यातून विनंती, विनवणी या छटा स्पष्ट होतात.
८) विध्यर्थ - आज्ञा, उपदेश, अपेक्षा, इच्छा, योग्यता, शक्यता, संभव वगैरे वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्यासाठी विध्यर्थाचा वापर करतात. काही वेळा विध्यर्थाचा उपयोग भविष्यकाळीही केलेला दिसून येतो.
९) आशीर्वादार्थ - आशीर्वाद देण्याकरता वा इच्छा प्रदर्शित करण्यासाठी या क्रियापदांचा उपयोग करतात. ही रूपे वाङ्गमयात अभावानेच आढळतात.
उदा. कुशलं ते भूयात्
अर्थ - तुझे कल्याण होवो. 'ङ्ग'

१०) हेतुहेतुमद्भाव किंवा संकेतार्थ -
. जेव्हा दोन वाक्यात कार्यकारणभाव असतो तेव्हा हेतुहेतुमद्भावाचा प्रयोग होतो. काही वेळा दोन वाक्यांशात एक वाक्यांश मुख्य असतो व दुसरा गौण असतो. गौण वाक्यातील घटनेवर मुख्य वाक्यांशातील घटना अवलंबून असते. तसेच पहिली घटना घडून न आल्यामुळे दुसरीही घटना घडून येत नाही, अशी स्थिती असते, अशा वेळी संकेतार्थाचा वापर करतात.
उदा.
१) सुवृष्टिश्चेदभविष्यत्, तदा सुभिक्ष्यमवर्तिष्यथ ।
अर्थ - चांगला पाऊस पडला असता तर चांगले पीक आले असते.


या वाक्यात चांगला पाऊस पडण्यावर चांगले पीक येणे अवलंबून आहे. म्हणजे दोन्ही घटनांमधे कार्यकारणभाव आहे. आणि चांगला पाऊस झाला नाही म्हणून चांगले पीक आले नाही, असे वक्त्याला म्हणावयाचे आहे. येथे पहिली घटना घडून आली नाही म्हणून दुसरी घटना घडली नाही. 


३) यदि राम: दण्डकारण्यं नागमिष्यत् तर्हि राक्षसानां संहार: नाभवत् ।
अर्थ - जर राम वनात गेला नसता तर राक्षसांचा संहार झाला नसता.


या वाक्यात राक्षसांचा संहार न होणे ही घटना रामाच्या दंडकारण्यात न जाण्यावर अवलंबून होती. पण रामाचे दंडकारण्यात न जाणे घडले नाही व राक्षसांचा संहार न होणे टळले नाही म्हणजे राम दंडकारण्यात गेला व राक्षसांचा संहार झाला. 


थोडक्यात कार्य-कारणभाव असलेल्या दोन वाक्यामधे पहिल्या वाक्यातील घटना घडून न आल्यामुळे दुसर्‍या वाक्यांशातील घटनाही घडली नाही असे सांगायचे असेल तर संकेतार्थाचा वापर होतो.

स्वाध्याय -
प्रश्न १ - खाली काही शब्द दिले आहेत. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

पाणि (हात). अग्नि, कवि, सारथि, गणपति, अलि (भुंगा), दाशरथि, माला, वनानि.

प्रश्न २)  खाली चार सुभाषिते दिली आहेत. त्यांचे मराठीमधे भाषांतर करा.

१) न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपु: । न चापत्यसम: स्नेह: न च दैवात् परं बलम् ॥७४-२१९॥

२) अहिंसा परमो धर्म: तथाऽहिंसा परो दम: । अहिंसा परमं दानं अहिंसा परमं तप: ॥७४-१२६॥

३) नास्ति लोभसमो व्याधि: नास्ति क्रोधसमो रिपु: । नास्ति दारिद्र्यवद्दु:खं नास्ति ज्ञानात् परं सुखम् ॥७४-११४॥

४) जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: ।
जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च दुर्लभा: ॥७४-१२८॥ 

=========================================

५१ स्वाध्याय उत्तरे - 


प्रश्न १ - खाली काही शब्द दिले आहेत. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

पाणि (हात).
मम पाणौ आम्रफलम् अस्ति ।

अग्नि
सुवर्णस्य परीक्षा अग्नौ भवति ।

कवि
कवि: काव्यानि करोति ।

सारथि
श्रीकृष्ण: अर्जुनस्य सारथि: अस्ति ।

गणपति
गणपति: विद्याया: देवता ।

अलि (भुंगा)
पुष्पेषु अलय: भ्रमन्ति ।

दाशरथि
दाशरथि: नाम श्रीराम: ।

माला
नार्य: पुष्पाणां माला शिरसि धारयन्ति ।

वन
ऋषय: वने निवसन्ति ।

प्रश्न २) खाली चार सुभाषिते दिली आहेत. त्यांचे मराठीमधे भाषांतर करा.

न च विद्यासमो बन्धुर्न च व्याधिसमो रिपु: ।
न चापत्यसम: स्नेह: न च दैवात् परं बलम् ॥

अर्थ - विद्येसारखा दुसरा भाऊ नाही, रोगासारखा दुसरा शत्रू नाही, मुलासारखे दुसरे प्रेम नाही व दैवासारखे दुसरे बल नाही.

२) अहिंसा परमो धर्म: तथाऽहिंसा परो दम: ।
अहिंसा परमं दानं अहिंसा परमं तप: ॥

अर्थ - अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म आहे, तसेच अहिंसा हा इंद्रियसंयम आहे. अहिंसा हे श्रेष्ठ दान आहे व अहिंसा हे श्रेष्ठ तप आहे.

३) नास्ति लोभसमो व्याधि: नास्ति क्रोधसमो रिपु: ।
नास्ति दारिद्र्यवद्दु:खं नास्ति ज्ञानात् परं सुखम् ॥

अर्थ - लोभासारखा दुसरा रोग नाही, क्रोधासारखा दुसरा शत्रु नाही, दारिद्र्यासारखे दुसरे दु:ख नाही व ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.

४) जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दन: ।
जनक: पञ्चमश्चैव जकारा: पञ्च दुर्लभा: ॥

अर्थ - जननी म्हणजे आई, जन्मभूमी जाह्नवी म्हणजे गंगा, जनार्दन म्हणजे विष्णु व जनक म्हणजे वडील हे पाच जकार म्हणजे ज ने सुरू होणारे शब्द नेहेमी दुर्लभ आहेत.

=========================================
 

" पपाठ ५१ वा काळ-विचार " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...