आज संबोधनावर आधारित काही सुभाषिते पाहूया.
१) भो दारिद्र्य नमस्तुभ्यं सिद्धोऽहं त्वत्प्रसादत:
पश्याम्यहं जगत्सर्वं न मां पश्यति कश्चन ॥१५-१॥
संधिविग्रह - भो दारिद्र्य नम: तुभ्यं सिद्ध: अहं त्वत्प्रसादत: । पश्यामि अहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ।
अन्वय - भो दारिद्र्य, तुभ्यं नम: । अहं त्वत्प्रसादत: सिद्ध: । अहं सर्वं जगत् पश्यामि कश्चन मां न पश्यति ।
अर्थ - हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. मी तुझ्यामु्ळे सिद्ध पुरुष झालो आहे. मी सर्व जग पहातो, पण मला मात्र कोणीही पाहू शकत नाही.
२) दारिद्र्य भोस्त्वं परमं विवेकि
गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् ।
विद्याविहीने गुणवर्जिते च
मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ॥
संधिविग्रह - दारिद्र्य भो: त्वं परमं विवेकि गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् ।
विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं न रतिं करोषि ।
अन्वय - भो: दारिद्र्य त्वं परमं विवेकि (असि) (हि त्वं) गुणाधिके पुंसि सदानुरक्तम् (असि) ।
विद्याविहीने गुणवर्जिते च मुहूर्तमात्रं रतिं न करोषि ।
अर्थ - हे दारिद्र्या तू अतिशय विवेकी आहेस. कारण गुण अधिक असणार्या पुरुषावर तू भाळतोस. विद्याहीन व गुणहीन माणसावर मात्र तू अजिबात प्रेम करत नाहीस.
३) रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयता
मम्भोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा: ।
केचित्वृष्टिभिराद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच: ॥३१-१७॥
संधिविग्रह - रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयताम् अम्भोदा: बहव: हि सन्ति गगने सर्वे अपि न एतादृशा: ।
केचित् वृष्टिभि: आद्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचित् वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: मा ब्रूहि दीनं वच: ।
अन्वय - रे रे मित्र चातक, सावधानमनसा क्षणं श्रूयताम् । गगने अम्भोदा: बहव: सन्ति हि सर्वे अपि न एतादृशा: ।
केचित् धरणीं वृष्टिभि: आद्रयन्ति । केचित् वृथा
गर्जन्ति । (अत:) यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: दीनं वच: मा ब्रूहि ।
अर्थ - हे मित्रा चातका, क्षणभर चित्त स्थिर करून मी सांगतो ते श्रवण कर. आकाशात मेघ अनेक आहेतपरंतु सर्वच सारखॆ णाहीत. काही वृष्टीच्या योगाने भूमंडळ भिजवून टाकतात व काही शुष्क गर्जना मात्र करत रहातात. म्हणून जो जो दृष्टीस पडेल त्याच्या पुढ्यात उगीच दीन भाषण करू नकोस.
४) अपसर मधुकर दूरं,
परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे ।
इह न हि मधुलवलाभो
भवति परं धूलिधूसरं वदनम् ॥
संधिविग्रह - अपसर मधुकर दूरं, परिमलबहुले अपि केतकीकुसुमे ।*
इह न हि मधुलवलाभ: भवति परं धूलिधूसरं वदनम् ॥
अन्वय - हे मधुकर, दूरं अपसर । हि इह परिमलबहुले अपि केतकीकुसुमे मधुलवलाभ: न भवति । परं वदनम् धूलिधूसरं (भवति) ।
अर्थ - हे भ्रमरा, दूर जा. या केवड्य़ाच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी येथे तुला थेंबभर सुद्धा मध मिळणार नाही. तुझे तोंड मात्र धुळीने माखले जाईल.
कवीला यातून काय सांगायचे आहे की एखाद्याच्या बाह्य देखाव्याला भुलून जाऊ नये. त्याच्याकडे तसे चांगले गुण असतील असे नाही.
५) हे हेरम्ब किमम्ब रोदिषि कुत: कर्णौ लुठत्यग्निभू:
किं ते स्कन्द विचेष्टितं मम पुरा सङ्ख्या कृता चक्षुषाम् ।
नैतत्तेऽप्युचितं गजास्य चरितं नासां मिमीतेऽम्ब मे
तावेवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ॥५०-४॥
संधिविग्रह - हे हेरम्ब किम् अम्ब रोदिषि कुत: कर्णौ लुठति अग्निभू:
किं ते स्कन्द विचेष्टितं मम पुरा सङ्ख्या कृता चक्षुषाम् ।
न एतत् ते अपि उचितं गजास्य चरितं नासां मिमीते अम्ब मे
तौ एवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ।
अन्वय -
पार्वती - हे हेरम्ब,
गजानन: - किम् अम्ब ?
पार्वती - रोदिषि कुत: ?
गजानन: - अग्निभू: कर्णौ लुठति ।
पार्वती - स्कन्द ते किं विचेष्टितं ?
स्कंद: - (गजाननेन) पुरा मम चक्षुषाम् सङ्ख्या कृता ।
पार्वती - गजास्य ते अपि एतत् चरितं न उचितं ।
गजानन: - अम्ब, (स्कन्द:) मे नासां मिमीते ।
कवि: - तौ एवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु व: ।
अर्थ -
पार्वती - हे गणेशा,
गणपती - काय आई ?
पार्वती - का बरं रडतोस ?
गणपती - स्कंद माझे कान पिळत आहे.
पार्वती - अरे स्कंदा, हा काय तुझा खोडकरपणा ?
स्कंद - अगं, याने माझे आधी डोळे मोजले.
पार्वती - अरे गजानना, हे तुझं वागणं काही योग्य नाही.
गणपती - आई, यानं आधी माझ्या नाकाची लांबी मोजली.
कवी - त्या दोघांना अशा प्रकारे अविचाराने वागतांना (भांडतांना) पाहून हसू लागलेली पार्वती तुमचे रक्षण करो.
No comments:
Post a Comment