Thursday, August 13, 2020

पाठ ४२A दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा

८) दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा  

    प्राणिजगतात मनुष्य सर्वाधिक संवेदनाशील मनुष्य आहे. पावलोपावली त्याला सुख-दु:ख, हर्ष-शोक यांची अनुभूती येत असते. त्यामुळे मानवाच्या मनात भाव व विचारांचे तरंग सतत उठत असतात. जेव्हा भावनांचा आवेग तीव्र होतो तेव्हा त्या विचारांची अभिव्यक्ती होते. आणि त्या अभिव्यक्तीचे माध्यम असते वाणी. अनुभूती व अभिव्यक्ती यांचा जेव्हा मणिकांचनसंयोग होतो तेव्हा वाणी आपला चमत्कार दाखवते व त्यातून काव्य निर्माण होते. तसेच तात्विक चर्चा करण्याच्या हेतूने शास्त्रग्रंथ निर्माण होतात. देश, काल व सामाजिक स्थितीत होणारी परिवर्तने यामुळे शास्त्र प्राचीन होत जाते. परंतु काव्य नेहेमी नित्य-नूतन व रमणीय असते. शास्त्र व काव्य यात अशा प्रकारचा फरक असला तरी काव्य हे शास्त्रविरोधी नसते. उलट हितोपकारक व कांतासंमित उपदेश देणारे असल्यामुळे शास्त्रातील शाश्वत सिद्धांतांचे अनुकरण करणारेच असते. दु:खांनी होरपळ्यानंतर त्या दु:खापासून दूर नेऊन काही काळ अलौकिक आनंदात रमवण्याची क्षमता काव्यात असते. जेथे चंद्रसूर्यांचा प्रकाशच पोचत नाही अशा मानवी हृदयाच्या आंतरिक क्षेत्राला प्रकाशित करण्याचे सामर्थ्य काव्यात असते.

(श्रव्य काव्याचा आनंद श्रवणेंद्रियांनी घेता येतो. ही काव्ये श्रवणीय व पठनीय असतात. यात शब्दांच्या द्वारा कल्पनेच्या सहाय्याने मानसिक चित्रे प्रस्तुत केलेली असतात. दृश्य काव्यात कवीने रंगवलेली मानसिक चित्रे डोळ्यांनी पाहून त्यांचे सौंदर्य व आनंद उपभोगता येतो. यात श्रवणेंद्रियांची आवश्यकता असली तरी नेत्रेंद्रियांचे प्राधान्य असते. श्रव्य काव्यापेक्षा दृश्य काव्याचा मनावर ठसा अधिक सखोल असतो. एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा ती पहाणे हे जास्त आनंददायक असते. )

संस्कृत साहित्यातील वाङ्मय प्रकार यामधे आपण श्रव्य काव्याविषयी माहिती घेतली होती. आता काव्याचा जो दुसरा प्रकार दृश्य काव्य त्याची माहिती आज करून घ्यायची आहे.

दृश्यकाव्य म्हणजे संस्कृतच्या संदर्भात नाटक. कारण ज्यावेळी संस्कृत भाषा आपल्या परम उत्कर्षावस्थेत होती, त्यावेळी चित्रपटाचा शोध लागलेला नव्हता. तेव्हा दृश्य काव्याचा आस्वाद नाटकामधूनच घेतला जात असे. वामन काव्यालंकारसूत्रात म्हटले आहे की ‘सन्दर्भेषु दशरूपकं श्रेय: । तद्धि चित्रं चित्रपटवत् विशेषसाकल्यात् ।’ चित्र ज्याप्रमाणे भिन्न भिन्न रंगांच्या मिश्रणाने सहृदय दर्शकाला आनंदित करते त्याप्रमाणे नाटक सुद्धा नट, वेशभूषा, नेपथ्य वगैरे अनेक अंगांनी दर्शकावर प्रभाव टाकते. काव्यापेक्षा नाटक श्रेष्ठ असण्याचे आणखीही एक कारण आहे. काव्याचा आस्वाद घेण्यास कवित्वमय वातावरणाची अपेक्षा असते. सर्वच वाचक असे वातावरण निर्माण करू शकत नाहीत. कारण ही वातावरण-निर्मिती कल्पनेतून निर्माण होते. अशी कल्पनाशक्ती सर्वांजवळच असते असे नाही. परंतु अशा रसानुभूतिसाठी नाटकात कवित्वमय वतावरण सहजच उपस्थित असते. ते वातावरण कल्पनेतून निर्माण करावे लागत नाही. त्यामुळे सर्वसामान्य दर्शक सुद्धा नाटकामुळे अधिक प्रभावित होतो. म्हणून ‘नाटकान्तं कवित्वम्’ नाटक हे कवित्वाची अखेरची सीमा आहे.

भारतीय नाटकाची उत्पत्ती केव्हा झाली असावी याविषयी पाश्चात्यांनी अनेक मते लढवली आहे.
 
    डॉ. रिजवे या ग्रीक तत्वज्ञाच्या मते भारतात नाटकाची उत्पत्ती वीरपूजेमधून झाली आहे. दिवंगत वीरपुरुषांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जे सामूहिक समारंभ आयोजित केले जात असत त्यातून भारतीय नाटकाचा जन्म झाला असावा. कारण ग्रीक नाटकांची उत्पत्ती अशाप्रकारे झाली आहे. पण हे मत इतर पाश्चिमात्त्यांना सुद्धा मान्य नाही.
    भारतीय नाटकात सूत्रधार महत्वाचा आहे. या शब्दातील सूत्र म्हणजे दोरी. कठपुतळ्यांचा खेळ पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर होत असे. तेव्हा भारतीय नाटकांचा उगम (पपेट शो) मधून म्हणजे या कठपुतळ्यांच्या खेळात आहे, असे जर्मन विद्वान डॉ. पिशेल मानतात
    काही पाश्चात्य विद्वान छायानाटकातून नाटकाची उत्पत्ती मानतात तर काही भारतीय नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा प्रभाव मानतात.

वास्तविक पहाता संस्कृत नाटकांचा उगम वेदामधेच दिसून येतो. ऋग्वेदामधे अनेक संवादसूक्ते आहेत. त्यात नाटकीय अंश दिसून येतात. पुरुरवा-उर्वशी, यम-यमी, इंद्र-इंद्राणी-वृषाकपी, सरमा-पणी या ऋग्वेदातील संवादसूक्तात नाटकाची बीजे आहेत. तर यज्ञप्रसंगी सोमरस काढण्याच्या वेळी सांअगायन केले जात असे. त्यामुळे संगीत शास्त्राचा उगम सामवेदात आहे. तेव्हा वैदिक युगामधेच संगीत व नाटक यांचा विकास होऊ लागला होता असे दिसून येते. कारण नाट्याच्या विकासासाठी लागणार्‍या संवाद, नृत्य, गीत, वाद्य इ. आवश्यक गोष्टी वैदिक युगात भरपूर प्रमाणात होत्या.

    रामायण व महाभारत या दोन आर्ष महाकाव्यात नाटकाचे काही स्पष्ट उल्लेख मिळतात. रामायणात अयोध्यावर्णनात वाल्मीकींनी तेथे असलेल्या नाटकमंडळींचा उल्लेख केला आहे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी नट, नर्तक व गायकांची उपस्थिती व आपल्या कलेने त्यांनी लोकांना आनंदित केल्याचे वर्णन आढळते. वाल्मीकी म्हणतात की ज्या देशात राजा नाही, त्या देशातील नट व नर्तक लोक प्रसन्न दिसून येत नाहीत. महाभारताच्या विराटपर्वात रंगशाळा, नट, नर्तक यांचे उल्लेख आहेत. बुद्धांनी आपल्या अनुशासनात नाट्याभिनय न करण्याची आज्ञा केली आहे. पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीत शिलाली व कृशाश्व ज्यांनी नाटकावर सूत्रग्रंथ लिहिले त्यांचा उल्लेख केला आहे. पतंजलीने महाभाष्यात कंसवध व वालिवध या दोन नाटकांचा उल्लेख केला आहे. हरिवंशात रामायणकथा अभिनीत केल्याचा उल्लेख आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रात नाटक व नटांचा उल्लेख आहे. अग्निपुराण, विष्णुपुराण यामधे सुद्धा नाटकासंबंधी पर्याप्त उल्लेख आहेत.

    मौर्य साम्राज्य स्थापन करणार्‍या आर्य चाणक्याने ‘अर्थशास्त्र’ हा राज्यशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ लिहीला. त्यात गणिका, दासी, अभिनेत्री, गायिका इत्यादींसाठी चित्रकला, वीणावादन, वेणुवादन, मृदंगवादन वगैरे ६४ कलांचे शिक्षण देण्यासाठी राजाने सुयोग्य आचार्यांचा प्रबंध केला पाहिजे असे म्हटले आहे. अर्थशास्त्रावरून कळून येते की त्यावेळी नट, नर्तक, गायक, वादक, कुशीलव, डोंबारी, इंद्रजालविद्या जाणणारे, नाटक, गायन वगैरे कलांवर आपली उपजीविका करत असत.
    आर्य चाणक्य हा चंद्रगुप्ताचा मंत्री. त्याचा काळ इ. स. पूर्व ४ त्ये शतक हा आहे.
    या सर्व उल्लेखांवरून संस्कृत नाटकांची प्राचीनता सिद्ध होते. नटांच्या शिक्षणासाठी ग्रंथ लिहिले जात असत. नाट्यकला ही आपली संपत्ती आहे. दुसर्‍या देशाकडून उधार घेतलेले धन नाही, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.

संस्कृत नाटकांचे प्राचीनत्व -
    भारतात संस्कृत नाटकांची एक विशिष्ट परंपरा आहे.
संस्कृत साहित्यात नाटकांची उत्पत्ती फार प्राचीन काळातच झालेली असली पाहिजे. कारण संस्कृत साहित्यातील प्रसिद्ध नाटककार भास हा इ. स. पूर्व दुसरे ते चौथ्या शतकाच्या सुमारास होऊन गेला. व कालिदासाचा काळ हा इ. स. पूर्व १ ले शतक ते इ. स. चे ४ थे शतक मानला जातो. ज्ञात इतिहासात भास हाच प्रथम संस्कृत नाटककार आहे. त्याची १३ नाटके प्रसिद्ध आहेत. भास व कालिदासाच्या काळात संस्कृत नाटक यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते. यावरून संस्कृत नाटकांचा उगम किती प्राचीन आहे याची कल्पना करता येते.

span style="color: blue;"> " दृश्यकाव्य व भारतीय नाट्यशास्त्राची परंपरा " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...